E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Wrutuja pandharpure
07 May 2025
श्रीरामपूरमधील ब्लॅकआऊटचे ते दिवस...
श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा दिवसातून दोनदा वाजायचा. सकाळी सहा वाजता होणारा भोंगा बहुसंख्य लोकांच्या ध्यानीमनीही नसायचा. रात्री साडेआठ वाजता होणारा भोंगा मात्र सगळ्यांच्या कानी पडायचा आणि त्यानुसार ते त्यांचा त्या दिवसाचा दिनक्रम आटपून घेण्याच्या तयारीला लागत असत.
आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर दूर असलेल्या, बाजारतळापाशी असलेल्या नगरपालिकेच्या संगमनेर रोडवरच्या ओपन थिएटर आवारातून हा भोंगा वाजत असे. त्याकाळी म्हणजे साठ आणि सत्तरच्या दशकांत मर्यादित सीमाहद्दी असलेल्या आणि ध्वनिप्रदूषण ही चीज ठाऊक नसलेल्या श्रीरामपूर शहराच्या बहुतेक सर्व भागांत या भोंग्याचा आवाज व्यवस्थितपणे ऐकू यायचा. कुठल्याही प्रकारची फार मोठी स्थानिक उद्योग कंपनी नसलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या श्रीरामपुरात दिवसातून दोनदा वाजल्या जाणार्या या भोंग्याचे नक्की प्रायोजन काय होते ते मला कधीच कळाले नाही.
या शहराच्या आसपास हरेगावची ब्रिटिशकालीन बेलापूर शुगर फॅक्टरी आणि टिळकनगरची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी हे दोन खाजगी साखर कारखाने आणि अशोकनगरचा सहकारी साखर कारखाना होता; पण या तिन्ही साखर कारखान्यांचा आणि नगरपालिकेच्या या भोंग्याचा काडीएक संबंध नव्हता; पण आम्हा शहरवासीयांच्या दैनंदिन जीवनात या भोंग्याला निश्तितच काहीतरी महत्त्वाचे स्थान होते हे नक्की. इतर रहिवाशांप्रमाणेच सकाळच्या भोंग्याकडे माझेही कधी फार लक्ष गेले नाही; पण रात्रीच्या साडेआठच्या भोंग्याची काही वेगळी बाब होती. रात्री साडेआठ वाजता पालिकेचा तो भोंगा वाजला की, दादा लगेच दुकान आवरायला लागायचे, त्या सोनार लेनमधली आजूबाजूची दुकानेसुद्धा पटापटा बंद व्हायला लागायची. नगरपालिकेचा रात्री साडेआठचा तो भोंगा अशा प्रकारे सर्व दुकानदारांना आपापली दुकाने बंद करण्याची आठवण करुन द्यायचा. गंमत म्हणजे याकाळात आमच्या आणि इतर सर्व दुकानांत भिंतीवर टांगलेली घड्याळे असायची, बहुतेकांकडे मनगटी घड्याळ असायचे. असे असले तरी रात्री दुकाने बंद होण्यासाठी त्या भोंग्याचाच आदेश पाळला जायचा. हा, बुधवारचा मात्र एक अपवाद असायचा. दर बुधवारी अनेक दुकाने रात्री आठ वाजण्याआधीच बंद व्हायची, याचे कारण म्हणजे त्याकाळात रेडिओ सिलोनवरून प्रसारित होणारी अमीन सयानी यांचा बिनाका गीतमाला’ हा नवनवीन ’हिट’ हिंदी चित्रपट गाण्यांचा त्याकाळचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम. त्यादिवशी रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत घरांघरांत कुटुंबातली सर्व लहानथोर मंडळी रेडिओवरचा हा कार्यक्रम कान देऊन ऐकत असायची. देशात कृष्णधवल टेलिव्हिजनचे आगमन होण्यास त्यानंतर आणखी एक तप म्हणजे दहा-बारा वर्षांचा अवधी होता. त्याशिवाय महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला ३० जानेवारीला सकाळी बरोबर अकरा वाजता हा भोंगा वाजायचा, त्यावेळी असेल त्या जागी एक मिनिट स्तब्ध राहून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करावी अशी अपेक्षा असायची. आम्ही मुले शाळेत असताना अशा प्रकारे गांधीजींचे स्मरण करायचो, तर श्रीरामपूर पालिकेचा रात्री साडेआठचा हा भोंगा कधी काही कारणाने वाजला नाही असे कधी व्हायचे नाही. मात्र अचानक काही काळ श्रीरामपूर नगरपालिकेचा हा भोंगा दिवसाअपरात्री, वेळी अवेळी वाजू लागला.
नेहमीच्या परिचयाच्या त्या भोंग्यांच्या अशा कधीही वाजण्याने सुरुवातीला काही दिवस लोकांची घबराट व्हायला लागली. अर्थात हे भोंगे असे वेळीअवेळी का वाजतायेत हे एव्हाना लोकांना माहीत झाले होते. पन्नास वर्षांपूर्वीचे म्हणजे १९७१ सालच्या डिसेंबर महिन्याचे ते दिवस होते आणि त्यावेळी भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला होता. भारताचे पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे शत्रूपक्षाकडून कुठल्याही भारतीय मुलखावर कधीही हल्ला होऊ शकतो, त्यामुळे अशा हल्ल्यास लोकांनी कसे तोंड द्यायचे याची रंगीत तालिम म्हणून असे भोंगे अचानक वाजवले जात असत.
‘युद्धस्थ कथा रम्य’ असे एक सुभाषित असले तरी युद्धाच्या छायेत राहाणे तितके सोपे नसते. तीन डिसेंबरपासून सुरु झालेल्या या युद्धाच्या काळात सीमाहद्द वगळता भारताच्या कुठल्याही मध्यवर्ती प्रदेशांत सैनिकी किंवा बॉम्ब हल्ले झाले नाहीत, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हे आमचे शहर देशाच्या कुठल्याही सिमेवर नाही, त्यामुळे या भागात विमानांतून शत्रु हल्ला होण्याची शक्यता फार धूसर होती. तरीदेखील खबरदारी म्हणून देशाच्या विविध प्रदेशांत अशी काळजी घेतली जात असावी. त्यावर्षी मी सहावीला शिकत होतो; मात्र जिल्हा परिषदेच्या आमच्या जीवन शिक्षण मंदिर (खटोड) शाळेत दररोज सकाळी सामूहिक प्रार्थनेच्या वेळी वृत्तपत्रांतील प्रमुख काही बातम्यांचे मथळे वाचले जायचे. हे मथळे वाचणार्या तीन-चार विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश होता, त्यामुळे सकाळीच वृत्तपत्राचे पहिले पान नजरेखालून घालावे लागे. याच काळात भारताच्या पूर्व सीमेवर अचानक भारतीय सेनेच्या मोठ्या कारवाया सुरु झाल्या होत्या आणि त्यासंबंधीच्या बातम्या विशेषतः भारतीय लष्कराच्या मदतीने आगेकूच करणार्या बांगला ’मुक्ती बाहिनी’च्या फौजेला मिळणारे यश याबाबतच्या बातम्या वाचणे खूपच रोमांचकारी असायचे. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच वृत्तपत्रे वाचायची सवय लागली, ती कायमची लागलीच.
सत्तरच्या दशकात तंत्रज्ञान आणि युद्धशास्त्र आजच्या इतके प्रगत नव्हते. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे परस्परांच्या हद्दीत खूप आत जाऊन बॉम्बहल्ला करु शकत नव्हती. विमानाच्या हालचाली अचूक टिपणारी रडार यंत्रणा तोपर्यंत विकसित झाली होती; मात्र तरीही रडार यंत्रणा भेदून शत्रूची विमाने भारतातील मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर हल्ला करतील अशी शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती. म्हणूनच पाकिस्तानची विमाने भारतात शिरल्यास घ्यावयाच्या खबरदारी आणि बॉम्ब वर्षाव झाल्यास काय करावे याचे मार्गदर्शन या काळात दररोज केले जात होते हे मला स्पष्ट आठवते.
यातला आणखी एक खबरदारीचा उपाय म्हणून त्या युद्धाच्या काळात शहरात रोज रात्री ‘ब्लॅकआऊट’ असायचा. शत्रूच्या विमानांना ही शहर लोकवस्ती आहे हे कळू नये म्हणून रात्रीच्या काळात असा अंधार केला जायचा. रस्त्यावरचा, दुकानांतला आणि घरांतला वीजपुरवठा पूर्णतः बंद असायचा. त्याकाळात देशात आणि महाराष्ट्रात विजेचा फारसा वापर वाढलेला नव्हता. विद्युतीकरण केवळ काही श्रीमंत लोकांच्या घरांपर्यंत आणि दुकानांत पोहोचले होते. आमच्या ‘पारखे टेलर्स’ दुकानात आणि सोनार लेनमधील इतर बहुतेक दुकानांत तोपर्यंत विजेचे कनेक्शन आले नव्हते, त्यामुळे सूर्यास्ताआधी सगळे दुकानदार आपापल्या पेट्रोमॅक्स बत्त्या साफसूफ करुन त्या पेटवत असत. आमच्या चाळीत एकाही घरात वीज आलेली नव्हती, त्यामुळे रॉकेलच्या छोट्या-मोठ्या बत्त्या, एक-दोन कंदील यावर संपूर्ण घरांत स्वयंपाक व्हायचा, इतर कामे उरकली जायची.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आमच्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरातही खूप कमी होती. या कारणांमुळे एरव्हीसुद्धा या तालुक्याच्या ठिकाणी संध्याकाळनंतर शत्रूपक्षाच्या विमानातून खाली जमिनीवर उजेड दिसून मानववस्तीची कल्पना येईल अशी शक्यता फार कमी होती. या ब्लॅकआऊट उपायाव्यतिरिक्त लोकांनी बिडीकाडीसाठीसुद्धा काडी पेटीचा वापर करु नये अशी सक्त ताकीदच होती. फारच तलफ आली तर दोन्ही हातांनी झाकून म्हणजे मूठ बंद करुन विडी शिलगावी, ओढावी असा आदेश होता. त्या दिवसांत शहरात अनेकदा वर उडणार्या हेलिकॉप्टर आणि विमानांची घरघर कानावर यायची. अशी हेलिकॉप्टर्स आणि विमाने श्रीरामपुरात क्वचितच दिसायची. शत्रूच्या विमानांचा बॉम्बहल्ला झाल्यास लगेच घराबाहेर पडावे, कुठलीही हालचाल न करता जमिनीवर झोपून राहावे अशा सूचना मिळाल्याचे आठवते. आजही स्पष्ट आठवते की, पूर्व पाकिस्तानात स्थानिक मुक्ती वाहिनीचे लोक भारतीय फौजेसह डाक्क्याच्या दिशेने आगेकूच करताना तेथील लोक त्यांचे आनंदाने उत्स्फूर्त स्वागत करत होते, अशा बातम्या दररोज वाचायला मिळायच्या. ते वाचून अंगावर रोमांच उभे राहायचे.
पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय फौजेसमोर पांढरे निशाण फडकावून बिनशर्त शरणागती पत्करली, हा या १९७१च्या युद्धाचा परमोच्च बिंदू आणि भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक अत्यंत रोमांचकारी घटना. भारतीय लष्कराचे प्रतिनिधी जनरल जगजित सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत पाकिस्तानी अधिकारी लेफ्ट. जनरल अमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी शरणागतीच्या करारावर सह्या केल्या, तो एक ऐतिहासिक क्षण. याचबरोबर बांगलादेश हे नवे राष्ट्र जगाच्या भूगोलावर अस्तित्त्वात आले.
पाकिस्तानातून सुटका होऊन शेख मुजिबर रेहमान दिल्लीत आले. त्या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबर रेहमान यांचे फोटो त्या दिवशी सर्व दैनिकांत पान एकवर ठळकपणे झळकले होते. भारत आणि पाकिस्तान ही दोन नवी राष्ट्रे जन्माला आली, तेव्हा अखंड भारताची बहुसंख्य हिंदू आणि बहुसंख्य मुस्लीम या आधारावर भारत आणि पाकिस्तान अशी धर्माच्या आधारावर फाळणी करण्यात आली होती. भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही एकमेकांपासून दूर अंतरांवर असलेले दोन वेगवेगळे भूखंड केवळ एक समान धर्म या आधारावर एक राष्ट्र म्हणून फार काळ राहू शकत नाही हे पूर्व पाकिस्तान हा प्रदेश पश्चिम पाकिस्तानपासून वेगळ झाल्याने सिद्ध झाले. केवळ धर्म या समान धाग्याच्या आधारावर लोक एक राष्ट्र म्हणून एकत्र नांदू शकत नाही हे यातून पुन्हा एकदा दिसून आले.
कामिल पारखे
मो. ९९२२४१९२७४
--------
माझं कसे होईल ? हा प्रश्न मला कधी पडत नाही. कारण
सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही.
त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे,
तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.
धाडसी माणूस भीत नाही, आणि भिणारा माणूस धाडस करत नाही.
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
-------
प्रेमाच्या पाझराची वाहती एक सरिता,
नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता,
जाणिवेच्या पलीकडचे जगावेगळे गाव,
यालाच तर आहे ‘आयुष्य‘ हे नाव.
-------
कोण म्हणे देव घरी येत नाहीत;
शबरीसारखी वाट बघून तर पहा.
कोण म्हणे देव काही देत नाहीत;
ध्रुव,भगीरथासारखे मागून तर पहा.
कोण म्हणे देव रक्षा करीत नाही;
प्रल्हाद, द्रौपदीसारखी आळवणी करून तर पहा.
कोण म्हणे देव ऐकत नाही;
नरसी, तुकारामांसारखे बोलून तर पहा.
कोण म्हणे देव नैवेेद्य ग्रहण करत नाही;
नामदेवांसारखे भरवून तर पहा.
डोळे उघडूनी नीट पहा देव आपल्या सोबतच आहे!
------
पिकलेले फळ हे तीन गुणावरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते. दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो.
त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टी वरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते. दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेहर्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.
------
तहान लागलेली असताना कोरड्या ओठांतून गोडच शब्द बाहेर पडतात. मात्र, एकदा का तहान भागली, की मग ‘पाण्याची चव‘ आणि ‘माणसाचे नशीब‘ दोन्ही बदलतात.
जोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात थोडेसे काही कमी पडायला लागले, की लगेच देवळात जाऊन नारळ फोडतात.
-------
Related
Articles
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
वाचक लिहितात
31 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा ताब्यात घ्या
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
वाचक लिहितात
31 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा ताब्यात घ्या
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
वाचक लिहितात
31 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा ताब्यात घ्या
29 May 2025
मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ
30 May 2025
वाचक लिहितात
31 May 2025
सात्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
30 May 2025
पुण्यात पावसाचा आणखी एक बळी
29 May 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह
30 May 2025
अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा ताब्यात घ्या
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
राज्यात मान्सून स्थिरावला
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार